मित्रांनो एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस सोयाबीनच्या दरात झालेल्या वाढीमुळे रिसोड बाजार समितीत सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. मात्र काही दिवसांतच सोयाबीनचे दर ४४०० रुपयांपर्यंत घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्री थांबवली आहे. परिणामी, अवघ्या पाच दिवसांत रिसोड बाजारातील सोयाबीनची आवक सुमारे ७०० क्विंटलने घटली आहे.
सध्या बाजारात सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ दिसून येत असली तरी दरातील सातत्यहीन चढ-उतारामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे खरिपाच्या तयारीत असलेले शेतकरी आपला माल साठवून ठेवत आहेत. काही शेतकरी साठवलेला माल विक्रीसाठी आणत असले तरी दर घसरणीच्या भीतीने अनेकांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे.
राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर आणि आवक यामध्ये फरक दिसून येत आहे. लातूर आणि अकोला बाजारात सर्वाधिक आवक असून तेथे सोयाबीनला सरासरी ४००० ते ४२०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे. दुसरीकडे, गंगाखेड, भोकर आणि देउळगाव राजा या तुलनेने कमी आवक असलेल्या बाजारांमध्ये सोयाबीनला ४००० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळतो आहे.
कृषी पणन मंडळाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांतील सोयाबीन दर पुढीलप्रमाणे होते – तुळजापूर येथे सोयाबीनला ४३०० रुपये दर मिळाला, अमरावतीत ४००० ते ४२५० रुपये, नागपूरमध्ये ४००० ते ४३६० रुपये, तर लातूरमध्ये ४०४० ते ४५४० रुपयांदरम्यान दर होते. काही बाजारांमध्ये कमाल दर ४६०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचेही आढळले.
या चढ-उतारांमुळे शेतकऱ्यांची उलथापालथ सुरूच असून, खरिपापूर्वी दर स्थिर राहतील का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या परिस्थितीचा अंदाज घेत सावधपणे पावले टाकत आहेत.