मंडळी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून महाराष्ट्रात नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार 16 मे रोजी मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचेल आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसांत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर दक्षिण कोकणात 5 जूनपासून तर मुंबई-पुण्यात 7 ते 8 जूनच्या दरम्यान मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. दरवर्षी मान्सून 9 ते 11 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल होतो, त्यामुळे यंदा तो अपेक्षेपेक्षा लवकर येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे कारण मान्सून लवकर सुरू होणार असल्याने खरीप हंगामासाठी शेतीची मशागत वेळेत पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. यावर्षी एन-इनो (El Niño) चा प्रभाव कमी असल्याने देशभरात, विशेषता पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे. अंदाजानुसार यावर्षीचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 105% पर्यंत राहू शकतो. त्यामुळे वेळेवर पेरणी होऊन उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या राज्यात अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आहे आणि नागरिक हैराण झाले आहेत. मात्र 13 मेपासून मध्य महाराष्ट्रात हलकासा ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असून त्यामुळे तापमानात घट होईल. मात्र या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. काही भागांत गारपीट, वादळी वारे आणि विजेचा कडकडाट यांचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.