Loan Waiwer Application : गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाला सत्तारूढ होऊन सात महिन्याचा कालावधी उलटूनही कर्जमाफी बाबत सत्ताधारी शब्दही काढायला तयार नाही. उलट मंचावरून बोलताना सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफीबाबत असमर्थता दर्शविल्या जात आहे.
त्यामुळेच दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते लोकनायक प्रकाश पोहरे यांनी किसान ब्रिगेडच्या माध्यमातून सातबारा कोरा करण्यासाठी कर्ज मुक्तीकरिता चळवळ सुरू केली. या अभियानाला जिल्ह्यासह सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण कर्जमुक्ती अभियानाच्या १४ मे रोजी पहिल्या टप्प्यानंतर २६ मे रोजी राबविण्यात आलेल्या कर्जमुक्ती अभियानाच्या दुसन्या टप्प्यातही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेले आश्वासन पाळा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अशा घोषणा देत अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर समूहाने जाऊन तहसीलदार यांना किसान ब्रिगेडच्या शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे अर्ज सादर केले.
अर्ज सादर करण्यासाठी सकाळी ११ वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत होती. खामगाव तालुक्यातील ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी शेतकरी नेते लोकनायक प्रकाश पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली किसान ब्रिगेडचे खामगाव तालुका अध्यक्ष संतोष इंगळे यांच्या नेतृत्वात अर्ज सादर केले. विशेष म्हणजे अर्ज सादर करण्यासाठी जात असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा करीत होते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने येत असलेल्या शेतकऱ्यांच्या समुहाने तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत होती. अनेक शेतकऱ्यांनी वैयक्तिक रित्याही तहसीलच्या आवक-जावक विभागाकडे अर्ज सादर केली आहे.
लोणार तालुक्यातील ३६० शेतकऱ्यांनी दुपारी चार वाजेपर्यंत कर्जमुक्ती साठी तहसील कार्यालयात अर्ज सादर केले होते. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सर्वत्र दिसत होते. तसेच संग्रामपूर तालुका प्रतिनिधीने कळविल्यानुसार तालुक्यातील १ तब्बल ३५० शेतकऱ्यांनी अर्ज सादरकरण्यासाठी कार्यालयावर गर्दी केली होती.
त्याचप्रमाणे देऊळगाव राजा तालुक्यातीलही १२५ शेतकऱ्यांनी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज सादर केले आहेत. या तहसील कार्यालयातही शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.