मंडळी देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ऐन काढणीच्या टप्प्यावर आलेले पिक निसर्गाच्या लहरीपणामुळे उध्वस्त झाले असून, फळपिकांवर विशेषता मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, देशभरात उष्णतेची तीव्रता वाढत चालली आहे. दिल्लीमध्ये धुळीचे वादळ निर्माण झाले असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस बिहारमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय पंजाब, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रात पण उन्हाचा कडाका अधिक जाणवत आहे. विशेषता विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत.